ऐका ऐका सगळे गावकरी ! पुरूष आणि नारी !
(पोवाडा-१)
ऐका ऐका सगळे गावकरी ! पुरूष आणि नारी !
भारत स्वतंत्र झाला अपुला ।
नाही आता हक्क दुजा उरला ।
दिल्लीचा तक्त तुमचा झाला रे, जी0।।धृ०।।
सावधान रहा सर्वही, पचविण्यास ही,
सत्ता गांधीच्या तपस्येची ।
शेकडो बळि गेले त्यांची ।
लाज राखा त्या शहीदांची रे, जी 0।।
देशभक्तांनी लाविले पण, झाले कुर्बान,
पर्वा नाहि केली रे प्राणांची ।
धनाची आणिक मानाची ।
तोडली बेडी मायभूची रे, जी 0 ॥
ही झाली मागची वार्ता ।
ऐकता वाटे शांतता ।
आनंद न मावे चित्ता ।
जाहली वाटे पूर्णता ।
अरे देश आला हातात, गमविला त्यात,
हिरा हा अमोल किंमतीचा ।
पूज्य गांधीजी देव अमुचा ।
विसर हा कसा पडला त्याचा रे, जी0 ॥१।।
स्वातंत्र्य तई हे पुरं, लोक भराभर,
जाणतिल राजकारणासी ।
लिहीता येईल सर्वांसी ।
कोणि ना गुलाम या देशी रे, जी0 ।।
खेडे गाव नंदनवन, राहील बनून,
तंगी नाही अन्ना पाण्याची ।
सोय होईल जीवनाची ।
दिवाळी सारखी सर्वांची रे, जी0॥१।।
करतील कमाई सारे, इमाने इतबारे,
स्नेह सर्वाशिच सर्वांचा ।
भेद नाहि उरला जातिचा ।
प्रगटला धर्म मानवांचा रे, जी०॥
(अंतरा)अति सुंदर राहणी आली ।
साफ गल्लि गल्लि ही झाली ।
ना दिसे कुणाची नाली ।
स्वच्छता घरोघर फुलली ।
जन दिशेस जाती दूर, करूनिया चर,
लावती खत हे शेतीला ।
दुर्गधी नाहिच गावाला ।
असे सुख मिळो भारताला रे, जी ॥२॥
सहकार करूनि सर्वही, धना सगळे हि,
मिळवूनी करतिल व्यापार ।
मुनाफा सगळ्यांना सारा ।
दलाला-वकिला नाही थारा रे, जी0॥
खरं-खोटं ठावूक गावाला, खर्च कशाला ?
कचेरी-कोर्ट गरज काय ?
करू आम्ही गावोगावी न्याय ।
होऊ ना देउच अन्याय रे, जी 0।।
असा दिवस निघेल भारता,तईंच पूर्णता
झालि आम्ही समजू स्वराज्याची ।
आज दुर्गतिच गरीबांची ।
पर्वा नाही कुणास कोणाची रे, जी 0।।
हे राज्य असे गरिबांचे ।
कष्टतील जे जे त्यांचे ।
समता हे बीज सुखाचे ।
सारखे हक्क सर्वांचे ।
हे वचन असे गांधीचे, कराया साचे,
जबाबदारी आहे जनतेची ।
चला रे करू कर्ती साची ।
कानि घ्या हाक ही तुकड्याची रे, जी 0।।३।।
नागपूर, दि.१४-१२-१९४५