लोकशाहीचे पोवाडे

ऐका ऐका सगळे गावकरी ! पुरुष आणि नारी !
भारत स्वतंत्र   झाला  अपुला ।
नाही आता हक्क दुजा उरला ।   
दिल्लीचा तक्त तुमचा झाला रे, जी 0।।धृ0।।
सावधान रहा सर्वही, पचविण्यास ही,
सत्ता गांधीच्या तपस्येची ।
शेकडो बळि गेले  त्यांची ।
लाज राखा त्या शहीदांची रे, जी 0।।
देशभक्तांनी लाविले पण, झाले कुर्बान,
पर्वा नाहि केली रे प्राणांची ।
धनाची आणिक   मानाची ।
तोडली बेडी मायभूची रे, जी 0।।
(अंतरा) ही झाली मागची वार्ता ।
ऐकता वाटे  शांतता ।
आनंद न मावे चित्ता ।
जाहली वाटे  पूर्णता ।
अरे देश आला हातात, गमविला त्यात,
हिरा हा अमोल किमतीचा ।
पूज्य गांधीजी देव  अमुचा ।
विसर हा कसा पडला त्याचा रे, जी 0।।१।।
स्वातंत्र्य तई हे पुरं, लोक भराभर,
जाणतिल शजकारणासी ।
लिहीता   येईल   सर्वांची ।
कोणि ना गुलाम या देशी रे, जी0।।
खेडे गाव नंदनवन, राहील बनून,
तंगी नाही अन्ना पाण्याची ।
सोय    होईल    जीवनाची ।
दिवाळी सारखी सर्वांची रे, जी0।।
करतील कमाई सारे, इमाने इतबारे,
स्नेह  सर्वाशिच  सर्वांचा !
भेद‌ नाहि उरला जातिचा ।
प्रगटला धर्म मानवांचा रे, जी0।।
(अंतरा) अति सुंदर राहणी आली । 
साफ गल्लि गल्लि   ही   झाली । 
ना दिसे   कुणाची   नाली ।
स्वच्छता घरोघर फुलली ।
जन दिशेस जाती दुर, करूनिया चर,
लावती खत हे शेतीला ।
दुर्गधी नाहिच गावाला ।
असे सुख मिळो भारताला रे, जी0।।२।।
सहकार करूनि सर्वही, धना सगळेहि,
मिळवूनी करतिल व्यापार ।
मुनाफा सगळ्यांना  सारा ।
दलाला-वकिला नाही थारा रे, जी0।।
खरं-खोटं ठावूक गावाला,खर्च कशाला?
कचेरी - कोर्ट   गरज    काय ?
करू आम्ही गावोगावी न्याय ।
होऊ ना देउच अन्याय रे, जी 0।।
असा दिवस निघेल भारता,तइंच पूर्णता,
झालि आम्ही  समजू  स्वराज्याची ।
आज दर्गतिच गरीबाची ।
पर्वा नाही कुणास कोणाची रे, जी 0।।
(अंतरा) हे राज्य असे गरिबांचे ।
कष्टतील जे जे  त्यांचे ।
समता हे बीज सुखाचे ।
सारखे   हक्क  सर्वांचे ।
हे वचन असे गांधीचे, कराया साचे,
जबाबदारी आहे जनतेची ।
चला रे करू कती   साची ।
कानि घ्या हाक ही तुकड्याची रे, जी0।।३।।
                                      नागपूर , दि. १४-१२-१९४५