जनतेचे सर्वत्र विडंबन , जनार्दना तुज दिसते का ?
( चाल : हरिका नाम सुमर नर . . )
जनतेचे सर्वत्र विडंबन , जनार्दना तुज दिसते का ?
वेळ कसा करतोस , पिता - पुत्रासि असे कधि असते का ? llधृ०॥
बंधु म्हणोनि अम्हीच अपुले , नाश कराया उठलो ना ।
काळा पैसा घुसखोरींनी , या जीवनातुनि मिटलो ना ।।
नीती नाही , प्रीती नाही , माणूसकीही नाही जरा ।
जो तो बावरल्या परि पैसा सत्ता घ्याया घेत छुरा ।।
कसला देश नि भेष कशाचा , स्वातंत्र्याची गरज नसे ।
मिळेल तैसे पाप करावे , भरण्याला अपुलेच खिसे । ।
याहुनि खेळ पुरे हा असला , देवा तुजला रुचते का ? ॥१॥
किती बघावी वाट , तुझा कुणी भक्तवीर वा संत निघे ।
जो निघतो तो नेभळाचि या विकृत स्वरुपासीच बघे ॥
उपदेशाची वाण नसे परि शक्ति त्यास तिळमात्र कुठे ।
जो तो ब्रह्मज्ञानचि सांगे गुरुडंबर हे टाळ - कुटे । ।
वीरांचे वीरत्व आपुली जात - पक्ष घेऊनि फिरे ।
गंड बंड हे धेड पाहनी , वाटे बुडबुडतात झरे ।।
प्रवाह अविरत निस्पृहतेने देश पुढे न्यायास कुणी ।
नाही आता उरला वाटे अंतर्मुख चिंतिता मनी । ।
विनाश करण्यासाठिचं आता देव अम्हासी हसतो का ? ॥२॥
शिफारसीने विद्या येते नोकरी मिळते जातीने ।
गुणवानांची महाफजिती लपती जागिच भीतीने ।।
असेल पैसा तोचि पुढे ये नाहि तरि त्या कोण पुसे ।
पाप कराया प्रवृत्त करणे सुधारणा तर हीच दिसे ।।
असंख्य जनता भोळी अजुनी लुबाडण्याची हद झाली ।
आता तर अन्नान्न - दशेची वेळ उराशी ही आली ।
कुठे पळावे ! काय करावे । धडकी जिवाशी बसते ना ? ॥३॥
सरकाराशी विकार झाला अपुला पक्ष टिकवण्याचा ।
न्याय असो अन्याय असो त्या मोहचि नाही शिकवण्याचा ।।
जो शिकतो , शिरजोरचि होतो अपुले घोडे दौडाया ।
चहबाजूनी ही बंडाळी , उठली देशा बुडवाया ।।
क्रांतिवीर कधी प्रभू पाठवी डोळे अमुचे पाहताती ।
नाहीतर ही प्रलय पताका दिसते काळाचे हाती ।।
तुकड्यादास म्हणे दिन दिन हा निसर्ग अंती रुसते का ? ll४॥