स्वातंत्र्याचा विजय असो , या भारतभूमी वरी
( चालः पटांतटाला फोडुनि आलिस . . )
स्वातंत्र्याचा विजय असो , या भारतभूमी वरी ।
मित्र हो अन्य राष्ट्रही तरी ।। धृ० ॥
विश्व सुखाचा घटक आपुला , देश धन्य म्हणविला ।
याच दिनि भारत - ध्वज फडकला ।।
स्वातंत्र्याची विजयदेवता , पुज्य गांधी आपुला ।
अहिंसेनेच विजय लाभला ।।
( अंतरा ) मानवी हक्क सकळास मिळो तो म्हणे । येरव्ही न स्वातंत्र्यास तिळभरी गणे ।
आराम न जनते तरी व्यर्थ ते जिणे ।
हेच समजुनि लढला न्याये , केली तपस्या पुरी ।
फडकला राष्ट्रध्वज अंबरी ।। १ ।।
त्याच मार्गि आदर्श देश हा , पुढे पुढे आपुला ।
आजवरि हेच करु लागला ॥
महान संकट पार करोनी , सफल होउ लागला ।
करोडो जीव जगवुनी भला ।।
संतमहंतानीच पूर्वि हा , गौरवुनी सोडला ।
त्याच मार्गावरि सरसावला ॥
( अंतरा ) ही मानवतेची ज्योत जागती असो ।
पाशवी शक्तिचा लेश न अंतरि घुसो ।
प्रेमाने समता - ममता , विलसो - दिसो ।
घराघरातुनि तरुण वीर हा , उत्पादन घे करी ।
सुगंधी ही जणु सोन्यापरी ॥ २ ॥
महामंत्र हा मानवतेचा , कथी विनोबा जना ।
लावुनी प्राण आपुले पणा ।।
भूमिदान , धनदान आणि श्रमदान करीती किती ।
बहरली भारतमाता - प्रिती ॥
चहु बाजूंनी जागृत झाले , जन हे ध्वनि फेकती ।
बाँट दो श्रम , धरती , संपत्ती ॥
( अंतरा ) या जागृतिने लोभी न राहती पुढे ।
जे करितील आळस जिव त्यांचा गडबडे ।
ही दैवि शक्तीची लाट उठे चहुकडे ।
समान होतिल रावरंक हे , दिसती जणुं अंतरी ।
तरुण हे उरु न देती उरी ॥ ३ ॥
लोभि - लबाडासाठी न आता , देश राहतो खुला ।
असा आवाज होउ लागला ।।
धरा धरा रे ! शराबवाले , गुंड - बंड गाविचे ।
नसावे दुर्गुणची कोणचे ।।
जिकडे तिकडे शिक्षण देउनि , भाग्य उठवु भूमिचे ।
न सहो दलालची कोणचे ।।
( अंतरा ) प्रत्येक गाव हे स्वतंत्र आता करु ।
अपुल्याच श्रमाने उत्पादन सावरु ।।
न्यायनीति सगळी अपुल्या गावी भरु ।
तुकड्यादास म्हणे उणिवेची , रीघ भरे बावरी ।।
खुशी ही होवो , संकलांतरी ॥ ४ ॥
- कलकत्ता - रेल्वे , दि . २४ - १२ - १९५४