हासत हासत आलि दिवाळी

( चाल : फटका . . . )
हासत हासत आलि दिवाळी , दिवाच विझला किति घरचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।धृ॥
मनात आहे दिवे उजळणे , कुठे करावे उंबरठे । 
घर गेले अणि छप्पर गेले , मोडमाड झाले घरटे ।। 
धन - धान्य ही वाहुनि गेले , अन्नाचा कन नाही घरी । 
लाडु - करंजी काय करावी , भाकरीही ना मिळे पुरी ।। 
जिकडे - तिकडे दुःख पसरले , तोल सावरावा कसचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ॥१॥ 
घर जावो पण जीवहि गेले , गेली गाई - गुरे तसली । 
कुठली गौळण नाचणार रे , हौस कुणाला ही असली ।।
बारुद उडवा कोण शहाणा , म्हणेल संकट ओढवता ? 
ज्यांना माणुसकी ना उरली , असाच बोले कोणि अता ।। 
परस्परांचे दुःख पाहनी , गळा न दाटे कोणाचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।२।।
जरीकाठी कपडे अणि सोने , दागदागिने का घाला ? 
आज तयावर पाळी तसली , न कळे येईल आम्हाला ।। 
म्हणुनि सगळे एकमताने , दिवाळिला सांगू रुसुनी । 
साथी अमुचे दुःखि म्हणूनी , दिवाळी न करु आम्हि कुणी ।। 
पुढचे दिवस सुखाचे यावे , तरीच सण हा दिवाळीचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।३।।
उरला सुरला पैसा जमवू , त्या लोकांना साह्य करु । 
ज्यांचे जीवन नष्ट जाहले , अन्न - वस्त्र त्यांना पुरवू ।।
घरोघरी त्या हीन - दिनाला , जेवण देण्या मान करु । 
तुम्ही आमुचे बंधु म्हणुनी , अति हर्षाने साह्य करु ।। 
कुठले हरिजन कुठले ब्राह्मण , सगळा भारतची आमुचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।। ४।। या वर्षाची हीच दिवाळी , कळकळिची ही हाक असे । 
संकटकाळी या वाचुनिया , दुसरा कोणी धर्म नसे ।। 
जे जे गेले त्या सगळ्यांना , अमुची श्रद्धांजली असे । 
अष्टग्रहांचा भाग म्हणुनी , अजुनी मन हे शांत नसे ।। 
तुकड्यादास म्हणे मज वाटे , अंत न पाहो प्रभु अमुचा । 
कसला मग उल्हास जीवाला , सण झाला वरचा वरचा ।।५।। 
- सौंसर ०९ - ०९ - १९६१