जन्म आणि बालपण
जिल्हा तहसिल अमरावती नामी ।
यावली या ग्रामी जन्म माझा ॥
लहानसे गाव खेडे देशमुखी ।
लोक होते सुखी तये काळी ॥
गणेश ठाकुर भक्त त्या गावीचा ।
होता पंढरीचा वारकरी ॥
लक्षुमी तयाची नाव तानाबाई ।
तिनेही करावी वारी सदा
दोघेही समाप्त झाले पंढरीसी ।
तयाच्या आत्म्याशी सुख लाभो
तयाचिया कुळी बंडाजी ठाकुर ।
यावलीसी घर होते त्यांचे ॥
तयाची लक्षुमी नाव मंजुळाबाई ।
भक्त हे दोघेही राहती तेथे ॥
तयाचिये पोटी जन्म माझा डाला ।
कार्तिक पौर्णिमेला माध्यान्हासी ॥
माझे जन्म नाव माणिक सांगती।
परि माझी मति तैसी नाही ।।
तुकड्या नावाने लोकी मी खेळलो।
उजेडीया आलो तुकडे खाता ।।
यावली या गावी गेले तान्हपण ।
साधु संत जन आर्शीवादे ॥
भोळी भाळी माता, कांही समजेना ।
परि नारायणा न सोडी ती ॥
तान्हपणी मज संत-दर्शनास ।
धरोनिया हौस नेई भावे ।॥
आकोट ग्रामीचे हरिबुवा सिद्ध ।
देती आर्शीवाद तान्हपणी ॥
संत गुलाबराव माधान गावीचे ।
आशिर्वाद त्यांचे बालकासी ॥
तुकड्यादास म्हणे नवसे मी झालो ।
प्रसादे लाभलो निधानाच्या ॥
लहानशा वयी बिकट प्रसंग ।
ओढवले चांग आई सांगे ॥
भोळीभाळी माता समजेना कांही ।
सांगे आईबाई तिजलागी ॥
रोड तुझा पुत्र बिबे लाव यासी ।
बाळसे देहासी येई तेव्हां ॥
ऐकोनी आईने लावियले बिबे ।
अंग झाले बंबे सुजोनिया ॥
दाखवी पतीसी पहा माझे बाळ ।
जाहले प्रबळ कैसे दिसे ! ।
तुकड्यादास म्हणे सर्व अंग सुजे ।
तिजवाटे साजे बाळ माझे ॥
माझी जन्म-कथा मज नाही ठावी ।
वडिले सांगावी कळे आम्हां ।
माय बहू भोळी, कळे ना तिजला ।
कोणी कांही बोला सहन करी ।
बिबे लावावया सांगे एक बाई ।
लाविले अंगीहि सर्व माझ्या ।।
सुजलासे देह म्हणे लट्ठ झाला ।
बाळपणी गेला काळ ऐसा ।
तुकड्यादास म्हणे आम्ही भिकाऱ्याचे ।
परि सुभाग्याचे देव-कृपे ॥